नवी दिल्ली दि.२३ जुलै
स्वातंत्र्या्च्या अमृत महोत्सवानिमित्ताने केंद्र सरकारने प्रत्येक घरात तिरंगा या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमांतर्गत 11 ते 17 ऑगस्टच्या काळात, आपआपल्या घरात राष्ट्रध्वज तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनासाठी सरकारने )राष्ट्रध्वजाच्या संहितेत बदल केला आहे.
राष्ट्रध्वज आता दिवसा आणि रात्री फडकवण्याची अनुमती नियमांनुसार दिली गेली आहे. त्याचबरोबर पॉलिस्टर आणि मशीनने तयार केलेला राष्ट्रध्वज तिरंगाही वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवातंर्गत सरकार 13 ते 15 ऑगस्टच्या काळात प्रत्येक घरात तिरंगा या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. त्या कार्यक्रमासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. प्रत्येक घरात तिरंगा फडकावण्याच्या या कार्यक्रमामुळे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. तसेच प्रत्येक घराघरात तिरंगा फडकावून राष्ट्रप्रेम जागृत करण्याचाही हा प्रयत्न असल्याचे मानण्यात येते आहे.
भारतीय ध्वज संहिता 2002 च्या भाग दुसऱ्यातील परिच्छेद 2.2 मध्ये आता बदल करण्यात आला आहे. त्यानुसार जिथे राष्ट्रध्वज मोकळ्या जागेत किंवा कुठल्या नागरिकाच्या घरात लावण्यात येईल,तिथे दिवसा आणि रात्री त्याला फडकवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यापूर्वी तिरंग्याला केवळ सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत फडकवण्याची अनुमती होती. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका नियमातही बदल करण्यात आला आहे. त्या बदलात लिहिण्यात आले आहे की – राष्ट्रध्वज हा हातानी तयार केलेला किंवा मशिनवर तयार झालेला असोल. कापूस, पॉलिस्टर, उन, रेशीम खादीपासून तो तयार झालेला असावा. यापूर्वी मशिननी तयार केलल्या किंवा पॉलिस्टरच्या राष्ट्रध्वजाला अनुमती नव्हती.