अहमदनगर दिनांक 9 नोव्हेंबर
अहमदनगर शहरातील उड्डाणपूल पूर्णत्वास आला असून येत्या 19 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचा लोकअर्पण होणार आहे.मात्र सध्या हा पूल चांगलाच चर्चेत आला आहे. मागील काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी या उड्डाणपूलाची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना खा.सुजय विखे पाटील यांनी या उड्डाणपूल याविषयी माहिती देत असताना या उड्डाणपुलाबद्दल कोणी कोणी योगदान दिले याबाबत शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड यांचे नाव घेतले नव्हते त्यामुळे शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आणि शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले होते. दुसऱ्या दिवशीच शिवसेनेच्या वतीने या उड्डाणपूलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर चांगलीच टीका केली होती.
तसेच शिवसेनेच्या फेसबुक पेज वरून खासदार सुजय विखे पाटील यांना लक्ष करून खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेने आणि स्व. माजी आमदार अनिल राठोड यांनी कशाप्रकारे मदत केली याची आठवण वेळोवेळी करून देण्यात आली होती. त्यामुळे अखेर खासदार सुजय विखे पाटील यांनी या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली असून स्वर्गीय अनिल राठोड यांचे आपल्या राजकीय जीवनात मोठे स्थान असून त्यांच्यामुळे आपण शहरामध्ये खासदारकीच्या निवडणुकीमध्ये मोठे यश मिळू शकलो असही सांगितले आहे.
त्यामुळे सध्या तरी या वादावर पडदा पडला असला तरी शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली आहे. अहमदनगर शहरात स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे खासदार सुजय विखे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करून सध्या तरी हा वाद शमवल्याचं दिसत आहे.