सोनई – दि ११ जुलै
महाराष्ट्र मध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर सध्या महाराष्ट्रात शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांच्या बळावर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची याबाबत अध्यापही वाद सुरू आहे. यादरम्यान महाविकास आघाडीमध्ये मंत्री म्हणून काम पाहिलेले अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आणि माजी मंत्री शंकराव गडाख यांनी दोन दिवसांपूर्वी मला आपल्याशी बोलायचंय अशी साद त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घातली होती त्यामुळे शंकराव गडाख आता कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे सर्वच जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
अहमदनगर जिल्ह्यात पारनेर आणि अहमदनगर शहर हे शिवसेनेचे बालेकिल्ले होते मात्र या दोन्ही ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला होता. तर शंकराव गडाख हेही शेतकरी विकास आघाडी कडून निवडून आल्यानंतर त्यांनी नंतर शिवसेनेचे शिवबंधन बांधले होते. मात्र मध्यंतरी झालेल्या सर्व घडामोडींमध्ये शंकराव गडाख यांची भूमिका समोर न आल्याने कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू होती. मात्र आज त्यांनी सोनई येथे भव्य दिव्य मेळावा घेऊन आपली राजकीय भूमिका जाहीर केली असून ते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याची त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
याआधी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख तसेच नेवासा तालुक्यातील अनेक मान्यवरांनी उध्दव ठाकरे यांच्या मागे राहण्याची भूमिका मेळाव्यात बोलताना जाहीर केली होती. त्यामुळे शंकराव गडाख यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणार असल्याचे जाहीर केले असले तरी येणाऱ्या निवडणुकांमध्ये राजकीय भूमिका कशी राहणार याबाबत पुन्हा एकदा बैठक घेऊन चर्चा करून निर्णय घेऊ असेही त्यांनी बोलताना सांगितले.
मंत्रिपद गेले याचे दुःख नसून विकास थांबेल याचे दुःख असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं मात्र तरीही आपण आमदारकीच्या माध्यमातून नेवासा तालुक्याला विकासाबाबत कोणताही निधी कमी पडू देणार नाही असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं या मेळाव्यात नेवासा तालुक्यातील अनेक मातबरांनी हजेरी लावली होती संपूर्ण सभागृह गच्च भरले होते शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.