अहिल्यानगर दिनांक 2 जून
आधी कोणत्या ना कोणत्या कारणाने ओळख करून घ्यायची. त्यानंतर पुरुषांकडून मोबाईल नंबर घ्यायचा मिस कॉल द्यायचा मोबाईल नंबर मिळाल्यावर पुरुषांशी जवळीक साधायची आणि त्यांची आर्थिक फसवणूक करायची असा फंडा नगर मध्ये सध्या सुरू असून यामध्ये चांगले चांगले लोक फसले गेले आहेत. मात्र अब्रूचे धिंडवडे उडण्यापेक्षा कुठेही बोंब न करता हे प्रकरणे सध्या बाहेरचे बाहेर मिटवण्याचा प्रकार सुरू आहे.
नगर शहरातील आजूबाजूच्या उपनगरांमध्ये हा प्रकार सध्या जोरदार पाहायला मिळत आहे. मात्र अनेक जण फसले गेले असले तरी. आपली अब्रू चव्हाट्यावर येईल या भीतीने पोलीस स्टेशनमध्ये न जाता एखाद्या मध्यस्थीमार्फत प्रकरणा मिटवून आपला गाळा सोडवून घेत आहेत.
असाच एक प्रकार समोर आला आहे आणि यामध्ये मोठी आर्थिक उलाढाल झाली असून एका महिलेने एका पुरुषास ऑनलाइन पैसे देण्याच्या कारणातून त्या पुरुषाचा मोबाईल नंबर मिळवला. त्यानंतर एक दोन वेळा त्या पुरुषाला काही सेकंदातच रिंग देऊन तो कट केला गेला. आणि पुन्हा त्या पुरुषाचा फोन आल्यानंतर चुकून मिस कॉल पडला असा बहाना करून बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर व्हाट्सअप च्या माध्यमातून गुड नाईट, गुड मॉर्निंग चे मेसेज सुरू झाले. आणि वेगवेगळ्या कारणाने फोन कॉल सुरू झाल्यानंतर त्या पुरुषास त्या महिलेने चहा पिण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलवून जवळीक साधली. आणि एक दिवशी असाच तो चहा पिण्यासाठी गेला असताना घराचा दरवाजा बंद झाला आणि काही मिनिटातच बाहेरून जोर जोरात दरवाजावर थापा पडू लागल्या तो माणूस घाबरून गेला. दरवाजा उघडल्यानंतर बाहेर त्या महिलेचा पती आणि आणखी एक जण असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेच्या नवऱ्याने तू या ठिकाणी माझ्या बायकोबरोबर काय करतो असे म्हणून त्या पुरुषास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या पुरुषाने आपल्या मोबाईलवर व्हिडिओ काढून तू इथे का आला कशासाठी आला येथे काय करत होता असे वदवून घेतले. त्या माणसाच्या खिशातील जेवढे होते तेवढे पैसे काढून घेण्यात आले. आणि हे प्रकरण मिटवायचे असेल तर तुला आणखी पैसे द्यावे लागतील अशी मागणी त्या ठिकाणी झाली अखेर आपला जीव वाचवण्यासाठी आणि इज्जत वाचवण्यासाठी त्यांनी सांगितलेली रक्कम कबूल करून त्या माणसाने कशीबशी त्या ठिकाणावरून आपली सुटका करून घेतली.
ही घटना घडल्यानंतर त्या पुरुषाच्या सर्व प्रकार हळूहळू लक्षात आला कारण त्या महिलेचा पती आणि ती महिला वारंवार फोन करून पैशाची मागणी करू लागले. यावरून आपण ट्रॅपमध्ये पक्के अडकलो असल्याचे लक्षात आल्यानंतर तो माणूसही भीतीने गळून गेला होता. मात्र त्याच्या एका जवळच्या मित्राला त्याने आपबिती सांगितली आणि त्याने थेट हे प्रकरण पोलिसांकडे नेऊन सोक्षमोक्ष लावण्याचा सल्ला दिला. (क्रमशः)
वाचत रहा पुढे काय झालं