अहमदनगर दि.७ ऑक्टोबर
लष्कराची बनावट एनओसी प्रकरणात बनावट एनओसी बनवून देणारे राजा ठाकूर आणि रोहन धेंडवाल हे दोन जण पोलिसांच्या ताब्यात आले आहेत . मात्र प्लॉट धारकांवर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नसून हा तपास वेग घेत असताना कोतवाली पोलीसांकडून तपास उपविभागीय कार्यालयाकडे अचानकपणे वर्ग करण्यात आला. रात्रीतून असे काय घडले की हा तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झेंडीगेट पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन इंगळे हे करत असताना अचानकपणे हा तपास उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहे. विशेष म्हणजे सहायक पोलिस निरीक्षक गजानन इंगळे यांनी मागील महिन्यातच शहर सहकारी बँक आणि श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या सोनेतारण प्रकरणात सहा कोटी रुपयांचे बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणाचा तपास योग्यरित्या केला होता. तो तपासही आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
त्यानंतर लष्कराच्या परिसरात बांधकाम करण्यासाठी बनावट एनओसी प्रकरण त्यांच्याकडे तपासासाठी आले होते. हा तपासही योग्य रीतीने होत असताना या प्रकरणात प्रमुख दोन आरोपींना अटक करण्याची कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक गजानन इंगळे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. हा तपास पुढे जात असतानाच अचानकपणे त्यांना तपासवर्ग करण्याच्या सूचना कोणाच्या दबावाखाली देण्यात आल्या का ? असा सवाल आता सोशल मीडियावर काही सामाजिक कार्यकर्ते विचारत आहेत! तपास योग्य रीतीने चालू असताना आणि या तपासात कोणतीही दिरंगाई अथवा आरोप झालेले नसताना अचानकपणे हा तपास काढून का घेतला ? याबाबत आता तर्कवितर्क सुरू असून महसूल विभागाचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणात दिरंगाई केली आहे तसेच या प्रकरणात गणेश नामक एका व्यक्तीची तपासणी झाल्यानंतर हा तपास वर्ग करण्यासाठी प्रचंड राजकीय ताकद लागल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ही राजकीय ताकत सर्वपक्षीय असून हा तपास पुढे राजकीय लोकांकडे वळण्याची शक्यता असल्याने हा तपास वर्ग केल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच सुरू आहे.
मात्र अशा प्रकरणामुळे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होते. चांगले काम करूनही तपासात असा अडथळा येत असेल तर पोलिसांनी काम कसे करायचे हा सवालही आता उपस्थित होतेय. मात्र दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी हे बनावट एनओसी बनवून देणारे आहेत. मात्र ज्या प्लॉट धारकांनी बनावट एनओसी उपविभागीय कार्यालयाला दिल्या होत्या त्या प्लॉट धारकरवर कारवाई कधी होणार ? कारण उपविभागीय कार्यलया कडून दिलेल्या फिर्यादीमध्ये अज्ञात इसम असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष दर्शी आणि शासकीय पत्रानुसार यामध्ये प्लॉट धारकांचे नाव आलेले आहेत. मग या प्लॉट धारकांवर कोणाची मेहरबानी आहे असा सवाल उपस्थित होतोय. या प्लॉट धारकांना आरोपी कधी करणार आणि त्यांच्या कारवाई कधी करणार यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते पाठपुरावा करत आहेत.