अहमदनगर दि.२० डिसेंबर
ठिकठिकाणी दारूबंदीसाठी मतदान घेतले जाते दारूबंदी केली जाते अनेक मोठमोठ्या शहरातही दारूबंदी आहे. त्याच प्रकारे गुटखाबंदी महाराष्ट्र राज्यात झाली आहे मग आपल्या शहरात, आपल्या गावात गुटखाबंदीसाठी मावाबंदीसाठी नागरिक रस्त्यावर का उतरत नाही हे काम फक्त पोलीस प्रशासन आणि अन्न औषध प्रशासनाने केलं पाहिजे का ! कारण या गुटख्या आणि माव्यामुळे आपल्याच घरातील तरुण व्यसनाधीन होत असताना नागरिकांचाही कर्तव्य आहे की याच्या विरोधात रस्त्यावर उतरायला पाहिजे तरच हा व विषारी शारीरिक कीड लागणारा पदार्थ हद्दपार होऊ शकतो.
पुण्यात गेलेले तरुण मोठ्या आभिमानाने सांगतात की नगर मधून येत असताना अनेकांचे निरोप येतात की नगरचा मावा घेऊन ये मित्रा पुण्यामध्ये असा मावा मिळत नाही अनेक पुणेकरांनाही या माव्याची आणि गुटक्याची चव लागलेली आहे. तर काही ठिकाणी पुण्यात अशा पाट्याही लागले आहेत की येथे नगरचा मावा मिळेल. मात्र हा अभिमान नव्हे तर तुम्ही मृत्यूच्या दाढेत जात आहात हे कसं लक्षात येत नाही.
जर नगर शहराचे उदाहरण घ्यायचे असेल तर कर्करोगाचे पेशंट वाढत असून शंभर पैकी 60 लोकांना मुखाचा कर्करोग तंबाखूजन्य पदार्थाने होत आहे. अनेकांना यामुळे शस्त्रक्रिया कराव्या लागत आहे अनेक बंधन या कर्करोगामुळे मानवाला येत असतात. कर्करोग हातात साधारण रोगासारखा झाला असल्यास दिसून येत आहे. कारण कर्करोग निदान करणाऱ्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये गेलं तर शेकडो लोक रोज कर्करोग निदान करण्यासाठी डॉक्टरांकडे येत असतात. हे चित्र आता रोजच दिसू लागले आहे आणि याची संख्याही वाढत आहे.
अहमदनगर शहरातील पान टपरीवर जाऊन नुसते उभे राहिले तरी समोरच्याला कळते की याला काय लागते. दहा रुपयाची माव्याची पुडी आता तीस रुपयांपर्यंत गेली आहे. लाखो रुपयांची उलाढाल रोज आणि करोडो रुपयांची उलाढाल महिन्याला या मावा आणि गुटक्यांमधून होत आहे. मात्र हे होत असताना दुसरीकडे अनेक तरुण कर्करोगाचे शिकार होत चालले असून हा कर्करोग प्रत्येक घराघरात शिरला आहे. प्रत्येकाच्या तोंडात मावा आणि गुटखा असल्याने एक ना एक दिवस तो कर्करोचा शिकार होणारच आहे.
या कर्करोगाच्या विरोधात लढत असताना आपल्याला या तंबाखूजन्य विषारी मावा आणि गुटख्याच्या विरोधात उतरावेच लागेल ज्याप्रमाणे एखाद्यावर अत्याचार झाल्यानंतर सर्व समाज त्या विरोधात पेटून उठतो त्याचप्रमाणे या ठिकाणी हजारो तरुण रोज मृत्यूच्या दाढेत जात आहेत त्यासाठी हा समाज एकवटून का उभा राहत नाही कुठे गेले ते समाज संघटना, समाजसेवक आणि अत्याचार अन्यायाविरुद्ध लढणारे लोक… गुटखा अत्यंत विषारी पदार्थ असून याच्या विरोधात आता सर्व लोकांनी रस्त्यावर उतरायला हवं अन्यथा हा कर्करोग एके दिवशी आपल्या घरातही प्रवेश करू शकतो.
ज्याप्रमाणे सध्या राज्यात देशात राजकारण सुरू आहे या ना त्या कारणाने हजारो लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत.काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी गुटख्यासारखा विषारी पदार्थ हजारो तरुणांच्या पोटात जातोय आणि हजारो तरुण भविष्यात कर्करोगाचे शिकार होऊ शकतात याच्या विरोधात जनतेने विविध पक्षांनी, नेत्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे तरच हा विषारी गुटखा हद्दपार होऊ शकतो.