अहमदनगर दि.३१ जुलै
सध्या भाजपशी घरोबा करून सत्तेचा उपभोग घेत आलेल्या विखे घराण्याने सुरुवातीला काँगेस नंतर शिवसेना आणि त्यानंतर पुन्हा काँग्रेस पक्षाशी गद्दारी केली. हा इतिहास आहे. तो सर्वाना माहित आहे तेव्हा केवळ सत्तेसाठी काँग्रेस आणि शिवसेनेशी गद्दारी करणारे विखे घराणे आणि खासदार सुजय विखे यांना उद्धव साहेबाना गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही असा टोला शिवसेना उप जिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी लगावला आहे. याबाबत त्यांनी पत्रक प्रसिद्धीला दिले आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र राज्याप्रती असलेल्या निष्ठेवर शंका घेत नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी उद्धव ठाकरे यांना गद्दार म्हटले आहे. त्याला जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर फुटलेल्या गद्दार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देऊन लोटांगण घालणारे भाजपाचे नेते आता शिवसेना नेतृत्वावर तोंडसुख घेऊ लागले आहेत. या वादात खासदार सुजय विखे यांनी विनाकारण उडी घेऊन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आपल्या वडिलांना मंत्री पद मिळावे या हेतूने सुजय विखे यांनी उद्धव साहेबानाच गद्दार ठरविण्याचा जावई शोध लावला आहे.
जिथे सत्ता तिथे विखे असे समीकरण हे विखे घराण्याच्या राजकीय परंपरेचे सूत्र आहे. विखे घराणे हे राजकारणात दलबदलू राजकारण करून आत्तापर्यंत तरले आहे.
ज्यांच्या रक्तातच गद्दारी आहे त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्यावर टीका करू नये अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दिला आहे.
भाजपचे खासदार सुजय विखे हे बेताल वक्तव्य करण्यामध्ये अतिशय सराईत आहेत . राजकीय वक्तव्य करणे योग्य पण एखाद्याला खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे किंवा अरे तुरेच्या एकेरी भाषेत बोलणे हे कितपत नैतिकतेला धरून आहे. खासदार सुजय विखे हे एक तर नगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी उपरे उमेदवार आहेत. त्या निवडणुकीत भाजपाने हा उमेदवार आमच्यावर लादला आणि शिवसेनेचे आमचे नेते स्व. अनिल भैय्या राठोड, माजी आमदार विजय औटी , प्रा. शशिकांत गाडे यांनी जिवतोडून काम केले. शिवसेनेच्या पाठबळावर त्यांनी विजय मिळवला पण याचा विसर सुजय विखे यांना पडला आहे.
सध्याच्या काळात सुजय विखे यांनी आमच्या नेतृत्वावर टीका कारण्याच्ये न थांबविल्यास आणि आगामी निवडणुकीत भाजपाने त्यांना खासदारकीची उमेदवारी दिल्यास शिवसेना आणि सामान्य मतदार यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा जाधव यांनी दिला आहे.