अहिल्यानगर दिनांक ८ मे
पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गेल्या ८ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा ‘पारा’ आज अचानक घसरला. सराफ सुवर्णकार समितीचे उमेश बोऱ्हाडे यांनी आज शहर बंदचा ‘हुकमी एक्का’ टाकला खरा, पण अहिल्यानगरच्या स्थानिक सराफ व्यावसायिकांनी मात्र आपली दुकाने थाटात उघडी ठेवून या आंदोलनातील ‘हवा’च काढून घेतली आहे.कोतवाली पोलिसांच्या मारहाणीविरोधात उमेश बोऱ्हाडे आणि त्यांचे साथीदार मैदानात उतरले आहेत. “अन्यायाविरुद्ध पेटून उठा” असा संदेश दिला जात असताना, शहरातील सराफ बांधवांनी मात्र शांत राहून व्यवसायाला पसंती दिली. बोऱ्हाडेंनी ‘दुकान बंद’ची हाक देऊनही बाजारपेठेत शुकशुकाट होण्याऐवजी सोन्याच्या पेढ्या ग्राहकांनी गजबजलेल्या पाहायला मिळाल्या.

यावरून “लढा कोणाचा आणि फायदा कोणाचा?” असा खमंग प्रश्न आता चहाच्या टपरीपासून ते सोन्याच्या दुकानापर्यंत चर्चिला जात आहे.गेल्या आठ दिवसांपासून सोशल मीडिया आणि एसपी ऑफिसबाहेर आंदोलनाचा मोठा गाजावाजा सुरू होता. मात्र, आजच्या ‘फ्लॉप’ बंदमुळे आंदोलनातील अंतर्गत फूट चव्हाट्यावर आली आहे. बाहेरून आलेल्या नेत्यांच्या आक्रमक पवित्र्याला स्थानिक व्यापाऱ्यांनी साथ न दिल्याने, उमेश बोऱ्हाडे यांची रणनीती सपशेल फेल ठरल्याची चर्चा आहे.आपल्याच बांधवांनी पाठ फिरवल्यामुळे आता आंदोलनकर्ते ‘बॅकफूट’वर आले आहेत.





