मुंबई दि.७ जून
आम्ही संभाजीनगर म्हणतोय म्हणजे औरंगाबादचं नामांतर झालं, असं वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेला मनसे नेते गजानन काळे यांनी पुन्हा एकदा डिवचलं आहे. तुम्ही सभेत संभाजीनगर म्हटलं की, झालं का? हे प्रत्यक्ष कधी होणार, असा सवाल गजानन काळे यांनी केला आहे. संभाजीनगरला असलेलं औरंगजेबाचं थडगं नेस्तनातूत करायची घोषणा होणार का? असा प्रश्नही काळे यांनी विचारला आहे.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा उद्या औरंगाबादमध्ये होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेत विक्रमी सभा घेतल्यानंतर त्यांचे बंधू शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्यातच महाविकास आघाडीमुळे पूर्वीचा हिंदुत्वाचा आणि आक्रमक अजेंडा पूर्णपणे राबवण्यास शिवसेना असमर्थ ठरतेय, असा आरोप केला जातोय. त्याच मालिकेत मनसे नेत्यानं शिवसेनेला डिवचलं आहे.