अहमदनगर दि२० एप्रिल (सुशील थोरात)
अमरावती जिल्ह्यात झेंडा काढण्यावरून दोन गटांमध्ये वाद अचलपूर आणि परतवाडा शहरामध्ये तणाव. दिल्ली मधील जहांगीरपुरी येथे घोषणा बाजी वरून हिंसा आशा बातम्या आता रोजच वाचायला मिळत आहे . मात्र यातून एक लक्षात येतंय की मागील काही वर्षांपासून धार्मिक मिरवणुका,झेंडे, आणि घोषणा तणावाचे करण ठरत आहे.
आपला देश हा लोकशाही मानणारा आहे आणि धार्मिकतेच्या बाबत तर विचारायला नको मात्र या कट्टरवादी धार्मिकतेच्या नावाखाली जो नंगानाच सुरू आहे हा नंगानाच देशाला खड्ड्यात नेल्याशिवाय राहणार नाही हे त्रिवार सत्य आहे.
धर्माचा अभिमान हवा मात्र माज नको या मुळे माणूस वाहवत जातो आणि त्याचा शेवट वाईटच होतो.आपल्या देशात स्वतंत्रपूर्व काळा पासून काही गोष्टी चालत आल्या आहेत मात्र त्या गोष्टी त्या काळाची गरज म्हणून सुरू झाल्या होत्या. आता त्या गोष्टींनी विकृत स्वरूप घेतल्याने त्याचा मूळ उद्देश गायब झाला आहे.काही दिवसांपासून देशात जे धार्मिक कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमातून धार्मिकता संपुष्टात आली आहे. त्या ठिकाणी फक्त विशिष्ट लोकांचा उदो उदो होतोय त्यात भारतातील सर्वच धार्मिक कार्यक्रम आले. मोठं मोठे बोर्ड लावणे कोणत्या देवाने सांगितले मोठं मोठ्या डीजेच्या भिंती आणि भोंगे उभा करून कर्कश गाण्यावर नाचणे कोणत्या धर्माने सांगितले विविध रंगाचे झेंडे लावून तणाव वाढवणे ,घोषणांनी देव पावतो हे कोणत्या धार्मिक पुस्तकात लिहलं आहे तर या सर्व प्रश्नांचे उत्तर नाहीच येणार.
मात्र तरीही धार्मिक कार्यक्रमात या सर्व गोष्टी केल्या जातात. वर्षभर सर्वधर्मीय एकत्र राहतात मग काही कार्यक्रमा वेळीच का सर्वाना आपला धर्म, झेंडा घोषणा आठवतात कि जाणीवपूर्वक आठवून दिल्या जातात .
सैनिकी ट्रेनिंग सेंटर, शाळा, कॉलेज,उद्योग,किंवा तरुणांना पुढे नेणारे साधन या साठी कधीच लाखोंचे मोर्चे निघाले नाहीत कारण याची मक्तेदारी फक्त काही ठरावीक लोकांनी घेतली आहे फक्त त्यांनीच या संस्था स्थापन करायच्या आणि चालवायच्या मात्र आरक्षण,धर्म,जातीवाद यासाठी लाखोंचे मोर्चे यादेशात निघतात याचे नेतृत पण काही ठरावीक लोकच करतात आणि फायदाही याच ठरावीक लोकांचा होतो त्यांच्या मागच्या गर्दीच्या हातात काहीच येत नाही येती ती फक्त मोर्चात सामील झाला म्हणून पोलीस केस.
एकविसाव्या शतकात प्रवेश करताना जगात भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जाणारा आहे किंबाहुना ओळखला जातोय मात्र आजकालच्या तरुणांच्या हाती एकविसाव्या शतकात तंत्रज्ञान, विज्ञान, अंतराळ,किंवा अजून देशाला पुढे नेणाऱ्या गोष्टी हव्या होत्या मात्र भारत देशात तरुणांच्या हाती झेंडे,दगड, हत्यार आणि मुखात घोषणा देऊन लोकशाहीच्या नावाने नंगानाच सुरू आहे.
आजकाल भोंगे आणि झेंड्यांवरून देशात तणाव वाढतोय या प्रकारात गुन्हे दाखल झलेल्या मध्ये फक्त कार्यकर्ते आहेत एकही नेत्यावर गुन्हे दाखल होत नाही आणि गुन्हे दाखल होणाऱ्या तरुणांची वय फक्त १५ ते २५ दरम्यानच्या आसपास आहेत. यात सर्वच धर्मातील तरुणांचा समावेश आहे ज्या वयात भविष्याची स्वप्ने पाहून शिक्षणाची वाटचाल करायची असते त्या वयात या तरुणांच्या हाती झेंडे आणि दगड पाहून स्वर्गातील देवदेवता अथवा या भूमीवरील सर्वच महामानव हाच विचार करत असतील की याच्यासाठीच होता का लोकशाहीचा अट्टहास.
झेंडे घ्यायला अथवा घोषणा द्यायला हरकत नाही मात्र त्यातून चुकीचा संदेश जायला नको नाही तर एक चूक जेलची हवा खायला लावते. करणारा करून जातो मात्र यात भरडला जातो तो निष्पाप तरुण ज्याच्या डोक्यात काहीच नसते तो फक्त त्या ठिकाणी एक प्रेक्षक म्हणून आलेला असतो मात्र काही अनुचित घटना घडली तर त्याला काही समजायच्या आत तो या गर्दीत मधील एक आरोपी म्हणून पकडला गेलेला असतो. आणि निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याला कोर्टाच्या चकरा माराव्या लागतात आणि यातूनच त्याचं भविष्य अंधारात जातं हे सत्य आहे.
मात्र जो चुकीचे कृत्य करतो तो पुन्हा एकदा नवीन टोळके घेऊन नवीन ठिकाणी जाऊन आपले चुकीचे कृत्य करण्यासाठी पुन्हा एकदा गर्दीमध्ये दगड घेऊनसामील झालेला असतो तो कोणत्याच जातीचा धर्मचा आणि पंथाचा नसतो तो फक्त धार्मिक कट्टरवादी असतो.