अहमदनगर- दि ४ जानेवारी
अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर झालेल्या शिवसैनिकांच्या हत्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात मोठा गोंधळ झाला होता.
या गोंधळात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दरवाजाच्या काचा फोडल्या नंतर पोलिसांनी भिंगार पोलीस स्टेशन मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गोंधळ घातल्याबद्दल राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. यामध्ये स्वर्गीय माजी नगरसेवक कैलास गिरवले यांनाही पोलिसांनी या गोंधळाबाबत अटक केली होती. या सर्व घटनेचा तपास आणि आरोपी पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास पवार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत होते.
स्वर्गीय कैलास गिरवले यांना अटक केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस कस्टडी मध्ये गिरवले यांची तब्येत खराब झाली होती त्यासाठी त्यांना नगर येथे आणि नंतर पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचं मृत्यू झाला होता. हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचा आरोप कैलास गिरवले यांच्या कुटुंबीयांनी केल्यानंतर गिरवले यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांन विरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कैलास गिरवले यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा दिल्या नंतर या प्रकरणाबाबत सीआयडी तपासाचे आदेश देण्यात आले होते.
सीआयडीने याचा सखोल तपास करत अनेक पुरावे तपासले यामध्ये काही सीसीटीव्हीमध्ये कैलास गिरवले यांना काठीने मारहाण करत असल्याचे फुटेज सीआयडीच्या ताब्यात आले आहे. यामध्ये पोलीस नाईक रवींद्र कर्डिले आणि पोलीस नाईक विजय ठोंबरे हे काठीने गीरवले यांना मारत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सीआयडीच्या पुणे येथील उपाधीक्षक वैशाली मुळे यांनी भिंगार पोलीस ठाण्यात तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रवींद्र कर्डिले हा मध्यंतरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला होता त्या नंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. तो सध्या पोलीस दलात हजर झाला असून आता हा मारहाणीचा दुसरा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला आहे.