यवतमाळ दि.१३ फेब्रुवारी
कार्यकर्ते हीच प्रत्येक पक्षाची ताकत असते आणि ओळख असते कार्यकर्त्यांच्या जीवावरच संघटना पक्ष वाढीला लागतो एक वेळ घर सोडेल ,मित्र सोडेल मात्र पक्ष सोडणार नाही अशी कट्टर कार्यकर्ते या महाराष्ट्राने पाहिले आहेत. शिवसेना तळागाळात पोहचली ती फक्त कट्टर कार्यकर्त्यांच्या जीवावर हे हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वेळा मान्य केले होते कार्यकर्ता हाच पक्षाचा आत्मा आहे म्हणून पक्ष जिवंत आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता म्हणजे फक्त आदेश यायचा उशीर काही मिनिटात त्या आदेशाचे पालन झालेले असायचे असे कार्यकर्ते फक्त शिवसेनेतच पाहायला मिळत होते.
यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना पक्षवाढीसाठी आंदोलनाच्या माध्यमातून तुरूंगावास भोगणरा कट्टर शिवसैनिक रस्त्यावर आला आहे.प्रमोद जाठे असे नेत्यांना घडविणार्या शिवसैनिकाचे नाव आहे. शिवसेनेत राहून त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. प्रमोद जाठे यांच्या संघर्षातून शिवसेना पक्ष ग्रामीण भागात बळकट झाला. प्रमोद जाठे यांना ओळखत नाही, असा एकही कार्यकर्ता जिल्ह्यात सापडणार नाही. राज्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आदी ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे. नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांनी खुर्ची मिळवली. परंतु, पक्षासाठी खस्ता खाणारा प्रामाणिक कार्यकर्ता रस्त्यावर आला आहे.
विशेष म्हणजे प्रमोद जाठे आज पक्षात सक्रीय नसले तरी त्यांनी दुसर्या कोणत्याही पक्षात जाणे पसंत केले नाही. कधी काळी मालदार म्हणून ओळखला जाणारा आणि पक्षासाठी स्वत:च्या खिशातून खर्च करणार्या शिवसैनिकावर आज फुटपाथवर बसून हळद-कुंकू आदींसह पुजेचे साहित्य विकण्याची वेळ आली आहे.
कोणताही नेता हा जन्मापासूनच नेता नसतो त्याला नेता होण्यासाठी कार्यकर्ता बनावेच लागते तिथून तो नेता बनतो मात्र या प्रक्रियेमध्ये तो नेता झाल्यावर आपण कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठे झालो हे विसरून जातो आणि मग संधिसाधू राजकारणात कार्यकर्ते मागे पडत जातात आणि जेव्हा त्यांना समजते की आपला फक्त उपयोग झाला आहे तेव्हा वेळ गेलेली असते.
जेव्हा केव्हा राजकीय आंदोलन असतात तेव्हा कार्यकर्ते नेत्याच्या पाठोपाठ चालत असतात कायदेशिर केसेस अंगावर घेत असतात वेळोवेळी दगड-गोटे खात असतात एक वेळ अन्न खाऊन पक्षासाठी झटत असतात मात्र खऱ्या कार्यकर्त्याला किंमत मिळत नाही आणि मग त्याला रस्त्यावर यावे लागते जे संधीसाधू कार्यकर्ते असतात ते नेते होतात आणि खरा कार्यकर्ता शेवटपर्यंत कार्यकर्ताच राहतो.
आजकल कार्यकर्ते राहिलेच नाही प्रत्येकाला नेता होण्याची घाई झाल्याने कार्यकर्ते कोण असा प्रश्न अनेकवेळा नेत्यांनाच पडतो कारण प्रत्येक कार्यकर्ता नेता असल्या सारखे समजतो त्यामुळे कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त झाले आहेत. पक्षासाठी समर्पित भावना त्याग आणि पक्षाशी बांधिलकी या सर्व गोष्टी आता फक्त ऐकण्यासाठी आणि बोलण्यासाठी राहिल्या आहेत कारण आजकाल नेते रात्री झोपताना एका पक्षात असतात तर सकाळी उठल्यावर दुसऱ्या पक्षात गेलेले असतात.
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा कार्यकर्त्यांची किंमत करणारे आहेत त्यामुळे ही गोष्ट त्यांच्यापर्यंत गेली तर नक्कीच प्रमोद जाठे यांना मदत मिळू शकते