अहिल्यानगर, प्रतिनिधी : सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्या (दि.10 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. मुकुंदनगर परिसरातील धीरज कचरुसिंग रजपूत (परदेशी) यांच्या मारहाणीत झालेल्या मृत्यूनंतर जिल्ह्यात वातावरण तापले असून विविध संघटनांनी या बंदला पाठिंबा दर्शविला आहे.
याच पार्श्वभूमीवर काका अहिल्यानगर जिल्हा वाहतूक संघटनेच्या वतीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी धावणाऱ्या सर्व स्कूल बस उद्या बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.
धीरज परदेशी यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार असून त्यांच्या मृत्यूप्रकरणी नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. जिल्हा बंदच्या आवाहनामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शालेय वाहतूक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत संबंधित शाळांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर विविध व्यावसायिक, सामाजिक व वाहतूक संघटनांनी आपापल्या भूमिका जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.





