अहमदनगर दि.१३ जुलै
महाराष्ट्र मध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड पुकारत भारतीय जनता पार्टी बरोबर सरकार स्थापन करून मुख्यमंत्री पद पटकावले आहे. त्यानंतर आता शिवसेना कोणाची याबाबत चांगलेच वाद सुरू असून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट सध्या शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख आहेत तर शिवसेना ही आमचीच आहे असं बंडखोर शिंदे गटाचे आमदार सांगत आहेत. त्यामुळे सध्या आता उद्धव ठाकरे यांना सोडून अनेक पदाधिकारी नगरसेवक शिंदे गटाकडे येत आहेत. अनेक आजी-माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपण त्यांच्याबरोबर असल्या सांगत आहेत.
आज गुरु पूर्णिमेच्या निमित्ताने अहमदनगर शहरातील तीन नगरसेवक ठाणे येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आले. मूळ शिवसेनेचे मात्र मध्यंतरी बसपा मध्ये गेलेले आणि पुन्हा शिवसेनेत परतलेले सचिन जाधव ,जेष्ठ नगरसेवक अनिल शिंदे आणि अनिल लोखंडे आणि प्रकाश फुलारी यांनी आज गुरुपौर्णिमे निमित्ताने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर तसेच ठाण्यात स्व. धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन वंदन केले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांचा सत्कार केला आहे.