Home क्राईम लष्कराच्या बनावट एनओसी प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका

लष्कराच्या बनावट एनओसी प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका

अहमदनगर दि.२४ ऑक्टोबर –

बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी आर्मी स्टेशन हेडक्वार्टर अहमदनगरच्या नावाने बनावट एनओसी तयार करून नगर उपविभागीय अधिकारी कार्यालयाची फसवणूक केल्याच्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती मंगेश पाटील व अभय वाघवासे यांच्या समोर सुनावणी पार पडली. कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात याचिकाकर्ते शाकीर शेख यांचा जबाब नोंदवून घ्यावा. तसेच तपासासाठी त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे रेकॉर्डवर दाखल करून घ्यावीत असे आदेश न्यायालयाने तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांना दिले आहेत.


नगर शहर व तालुक्यातील लष्कराच्या हद्दीलगतच्या मालमत्ता, प्लॉटवर बांधकाम परवानगीसाठी आर्मी हेडक्वार्टरकडून ना हरकत दाखला दिला जातो. मात्र, उपविभागीय कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या दाखल्यांपैकी काही दाखले बनावट असल्याचे समोर आले आहे. बबन भागचंद बेरड (रा. भिंगार ता.नगर), आमीर तकी मिर्झा (रा. मुकुंद नगर) व निलेश प्रेमराज पोखर्णा व इतर ५ जणांच्या प्रकरणात बनावट कागदपत्रे सादर करून उपविभागीय कार्यालयाची फसवणूक झाल्याची फिर्याद महसूल सहाय्यक संजय गोलेकर यांनी दिली आहे. त्यानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपअधीक्षक अनिल कातकाडे याचा तपास करत असून.या प्रकरणी शाकीर शेख हे दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होते. पोलिसांकडून केवळ तीनच प्रकरणात तपास सुरू आहे. इतरही अनेक प्रकरणात बनावट एनओसी देण्यात आलेली आहे. या प्रकरणाच्या तपासात शाकीर शेख हे पोलिसांना मदत करण्यास तयार आहेत. त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे रेकॉर्डवर घेऊन त्यांचा जबाब नोंदवून घ्यावा व त्या दृष्टीने सर्व एनओसीचा तपास करावा, अशी मागणी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, तसेच तपासी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्याची दखल घेण्यात न आल्याने त्यांनी उच्च न्यायालयात क्रिमिनल रीट पीटिशन दाखल केले होते.

त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये शाकीर शेख यांचा जबाब नोंदवून घ्यावा. त्यांच्याकडे असलेली इतर एनओसी बाबतची कागदपत्रे व पुरावे रेकॉर्डवर घेऊन त्या दृष्टीने तपास करावा, असे आदेश न्यायालयाने तपासी अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान बनावट एनओसी संदर्भात १.३० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे तपासात समोर आले असून, याबाबत पोलिसांकडून तपास होत नसल्याने शाकीर शेख यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे तक्रार केली आहे.

दरम्यान, उपविभागीय कार्यालयाकडून फिर्याद दाखल करत असताना मूळ आरोपींना वाचवून अज्ञात आरोपी विरोधात फिर्याद देण्यात आल्याप्रकरणी शाकीर शेख यांनी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या विरोधात महसूल विभागाच्या अवर सचिवांकडे तसेच विभागीय आयुक्तांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. विभागीय आयुक्त कार्यालयाने याची दखल घेत २५ ऑक्टोबरपर्यंत स्वयंस्पष्ट अहवाल अभिप्रायासह सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version