अहमदनगर दि.३० नोव्हेंबर –
एकीकडे अहमदनगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 32 कोटी रुपयांची जमीन स्मशानभूमी आणि दफनभूमी घेण्याचा ठराव मंजूर होत असताना दुसरीकडे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या कामगारांना गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महानगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी सांगूनही पगार होत नसल्याने अखेर त्यांनी काम बंद करण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कामगारांना महिन्याला आठ ते नऊ हजार रुपये पगार देऊ शकत नसणाऱ्या महानगरपालिकेला 32 कोटी रुपयांची जमीन खरेदी करण्यासाठी पैसे कुठून येणार हा मोठा प्रश्न आता समोर आला आहे.
अहमदनगर महानगरपालिकेतील अनेक विभागात कर्मचारी कमी असल्याने आणि राज्य सरकार नवीन कर्मचारी भरती करण्यास परवानगी देत नसल्याने महानगरपालिका कंत्राटी पद्धतीने विविध विभागात कर्मचारी भरती करीत असते. या कर्मचाऱ्यांना नऊ ते दहा हजारांपर्यंत मानधन दिले जाते. मात्र हे मानधनही देण्यात मनपा प्रशासन सक्षम नाही हे आता पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या कामगारांच्या तीन महिन्यांचे पगार थकल्यामुळे ही गोष्ट समोर आली आहे त्यामुळे मनपा प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी सुरुवातीला कर्मचाऱ्यांचे मानधन कसे देता येईल याचा विचार करावा. 32 कोटी रुपयांची जमीन घेण्यापेक्षा जे कर्मचारी काम करतात त्यांचा पगार आधी द्या आणि नंतर स्मशानभूमीचे बघा असा सूर या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून उमटला आहे. या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले तर याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठा वर होऊ शकतो. त्यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार तातडीने करावेत अन्यथा पुन्हा नगरकरांना पाणी प्रश्नला समोरे जावे लागेल.